अतिवृष्टीच्या दरम्यान खरीप पिकांची घ्यावयाची काळजी…..!

सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद या पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. अशा परीस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच खालील नमुद केलेल्या उपाय प्रमाणे सोयाबीन, कापूस, तूर व हळद पिकामधील अतिवृष्टी नंतर पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकरी बंधुंनी अवलंबावे.

👉 सोयाबीन :

  1. सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रथम शेतामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा.
  2. या वातावरणामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. गोगलगायीच्या नियंत्रणाकरीता दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगायनाशक 2 किलो प्रति एकर याप्रमाणे शेतामध्ये, बांधाच्या कडेला आणि बांधावर सायंकाळच्या वेळी पसरवून द्यावे.
  3. सध्या सर्वत्र सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे… सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या, शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा तसेच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी..
  4. क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5% – 60 मिली (3 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर
    किंवा
  5. इंडाक्झाकार्ब 15.8% – 140 मिली (7 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर
    किंवा
  6. असिटामाप्रीड 25%+ बाईफैंन्थ्रीन 25% -100 ग्रॅम (5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) प्रति एकर
    किंवा
  7. क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 4.60% – 80 मिली (4 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर
    किंवा
  8. आयसोसाक्लोसिरम 9.2% – 240 मिली (12 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर
  9. तसेच येणाऱ्या काळात शेंगा करपा, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन टेब्युकोनॅझोल 10%+ सल्फर 65% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – 500 ग्रॅम प्रति एकर (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% -250 मिली ( 12.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% – 150 ते 200 ग्रॅम ( 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3%+ इपिक्साकोनाझोल 5% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -300 मिली ( 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) प्रति एकर फवारावे.
  10. तसेच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मीत बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी युक्त औषधाची 4 किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.

कपाशी :

  1. कापूस पिकामध्ये अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतात प्रत्येक एक ओळ सोडून लहान चर काढावेत
  2. शक्य असेल तिथे वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
  3. आकस्मिक मर किंवा मूळकूज दिसू लागल्यास 200 ग्रॅम युरिया+ 100 ग्रॅम पांढरा पोटॅश (00:00:50 खत )+25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी.
  4. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.
  5. पिकाची वाढ पुर्ववत होऊन पाते लागण होण्यासाठी पिक 60 दिवसाचे झाल्यावर नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. त्यासाठी कोरडवाहू कपाशीकरीता 31 किलो तर बागायती कपाशीकरीता 51 किलो निमकोटेड यूरीया प्रति एकरी द्यावा.
  6. कापूस सध्या पाते व बोंडे अवस्थेत असल्यास आणि अशा परिस्थितीत जर नैसर्गिक पातेगळ होत असेल तर याच्या नियंत्रणाकरीता एनएए या संजीवकाची 40 मिली प्रति 180 लिटर पाणी या प्रमाणे प्रति एकरी किंवा 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी यामुळे नैसर्गिक पातेगळ थांबण्यास मदत होते.
  7. बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच संधिसाधू जिवाणू व बुरशींची वाढ होणार नाही.
  8. पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रस शोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात.
    9.सध्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% – 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)
  9. बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग म्हणजेच बाह्य बोंडसड रोखण्यासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन 20% – 10 ग्रॅम किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक)- 20 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% – 10 मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) – 10 मिली किंवा प्रोपीनेब 70% – 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
    आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

तुर :

  1. तुर हे पीक जास्त पाऊसास संवेदनशील आहे. म्हणूनच तुरीच्या शेतातील साचून राहीलेले पाणी ताबडतोब शेताबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे.
  2. तुर पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास मर ग्रस्त झाडे काढून टाकावीत व त्याठिकाणी तसेच चारही बाजूनी एक मिटर अंतरावर कार्बेडेंझीम 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
  3. तसेच जिथे कुठे मर रोगाची सुरूवात होत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड 25 ग्रॅम अधिक युरीया 200 ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेवून झाडांच्या मुळांना प्रति झाड 100 मिली द्यावे.
    4.तसेच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मीत बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची 4 किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.

👉 हळद:
सध्याच्या वातावरणामध्ये हळदीवर कंदमाशी या किडीचा आणि पानावरील ठिपके, करपा व कंदकुज सारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.

  1. कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक 15 दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस 25%- 400 मिली (20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा डायमिथोएट 30%- 300 मि.ली. (15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका कीटकनाशकाची प्रति एकर या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.
  2. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.
  3. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस 50%- 1000 मिली (50 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात) घेऊन प्रति एकरी या प्रमाणात आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी.
    4.पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापनासाठी करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी.
  4. रासायनिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.
    प्रादुर्भाव कमी असल्यास
    कार्बेडेंझीम 50% – 400 ग्रॅम (20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)
    किंवा
    मॅन्कोझेब 75% -500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)
    किंवा
    कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% – 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.
    प्रादुर्भाव जास्त असल्यास
    एजोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात)किंवा
    प्रोपीकोनॅझोल 25% – 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा
    क्लोरथॅलोनील 75% – 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)
    यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.
  5. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.
  6. जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.
  7. कंदकूज झाली असल्यास जमिनीतून
    कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा
    मॅन्कोझेब 75% -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा
    कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)
    यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी.
    (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.)
    (संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)

👉 सर्व पिकांमध्ये फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी:-

कुठलीही फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी

वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.

लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये

फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही

किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी

डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी.मांडगे
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ 02452-229000